मुंबई, ३ ऑक्टोबर २०२३ | नांदेडच्या शासकीय रूग्णालयात २४ तासात २४ मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली असताना सलग दुसऱ्या दिवशी आणखी सात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे म्हणाले, ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. ठाण्यातही अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत. तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय?’,असे म्हणत सवाल उपस्थित केला आहे. पुढे ते असेही म्हणाले, सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे, अशी परिस्थिती आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल याकडे अधिक लक्ष द्यावं, असे म्हणत राज ठाकरे यांनी ही टीका केली आहे.