छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवणमधील तो पुतळा आतून पोकळच होता आणि असा पुतळा कोणी समुद्र किनारी उभं करत का? असा सवाल करत शर्मिला ठाकरे यांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेवरून रोष व्यक्त केला. पुढे त्या असंही म्हणाल्या की, महाराजांनी बांधलेले गड-किल्ले आजही तसेच आहे आणि यांनी बांधलेला शिवरायांचा पुतळा केवळ ८ महिन्यात कोसळला, असं म्हणत शर्मिला ठाकरे आक्रमक झाल्या आहेत. “प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार होतोय. नाशिकचे रस्ते असू द्या तिथे लोक जायला धजावत नाहीत नाशिकहून मुंबईत यायचं झालं तर बारा बारा तास लागतात. मुंबई-गोवा महामार्गासाठी आम्ही आंदोलन केलीत, पण अजूनही त्या रस्त्यावर खड्डेच खड्डे…मला केवळ एवढेच सांगायचे की पुतळा हा पोकळ कसा असू शकतो? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तरी भ्रष्टाचार करणे सरकारने थांबवलं पाहिजे” असे शर्मिला ठाकरे म्हणाल्यात.