शिंदे सरकारकडून टोल माफी अन् मनसेचा पेढे वाटून एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले, ‘हे आमचं…’

| Updated on: Oct 14, 2024 | 12:33 PM

मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय शिंदे सरकारने दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली.

Follow us on

शिंदे सरकारच्या टोलमाफीच्या निर्णयानंतर मनसे नेते अविनाश जाधव हे मुंबईतील टोलनाक्यावर पोहोचले आणि त्यांनी वाहन धारकांना पेढे वाटप करून एकच जल्लोष केला. यानंतर ते म्हणाले, टोलमाफीचा निर्णय हे मनसेचं यश आहे. गेली १२ वर्ष मनसैनिक मुंबईत टोलनाक्यांवर आकारण्यात येणारा टोल रद्द करा, यासाठी सातत्याने आंदोलनाद्वारे सरकारकडे मागणी करत होते. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर कऱण्यात आलेल्या त्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थाने यश आले असून मनसेच्या कार्यकर्त्यांची ही मागणी आज सरकारने मान्य केली आहे, असे अविनाश जाधव म्हणाले. दरम्यान, मुंबईत टोलनाक्यांवर आकारण्यात येणारा टोल रद्द करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मनसैनिकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. यावर बोलताना अविनाश जाधव यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. ‘गुन्हे दाखल होणार की नाही. हे आम्ही बघत नाही. गुन्हे दाखल करायचे असतील तर पोलिसांना करू द्या. पण त्या आंदोलनाला यश आलं असून आजचा दिवस हा टोलमुक्तीचा आहे. महाराष्ट्रातील जनतेसाठी आम्ही अनेक गुन्हे आमच्यावर दाखल करून घेतले आहेत. सरकारला जेव्हा ते गुन्हे आमच्यावरचे काढायचे असतील तेव्हा काढू दे.. पण आमच्यासाठी टोल माफी व्हावी, हे महत्त्वाचं होतं’, असं अविनाथ जाधव म्हणाले.