मुंबई, २९ सप्टेंबर २०२३ | मुलुंड येथील सोसायटीमध्ये ऑफिससाठी जागा बघायला गेलेल्या मराठी महिलेला जागा नाकरण्यात आल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. याप्रकरणावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाष्य केले आहे. ‘कुणाचं आपण लांघुनचालन केलं तर त्याला त्याचं बळ मिळतंच असा आतापर्यंतचा इतिहास आहेत. केम छो वरळी असे मत घेण्यासाठी ज्यावेळी बोर्ड लावतात त्यावेळी तुम्ही त्यांना बळ देत असतात’, असे म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता टोला लगावला आहे. तसेच यामुळेच मुलुंडमध्ये जो प्रकार घडला तसे प्रकार घडतात असे म्हणत संदीप देशपांडे पुढे म्हणाले, ‘मराठी माणसाची एकी झाली पाहिजे. मुळात अशी हिंमत कुणाची होता कामा नये, याकरता आपण दक्षता घ्यायला हवी. तृप्ती देवरूखकर यांनी शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली.’, असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या संदर्भात एखादा कडक कायदा देखील तयार झाला पाहिजे, त्याची दहशतदेखील अशा लोकांवर राहिली पाहिजे, असे म्हणत संदीप देशपांडे यांनी कायद्याची मागणी केली.