मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत २२५ ते २५० जागा लढण्याची घोषणा केली आहे. इतकंच नाहीतर काही करून पदाधिकाऱ्यांना सत्तेत बसवणार असंही राज ठाकरे म्हणाले. मनसेने केलेल्या एका सर्व्हेनुसार २२५ ते २५० जागा लढण्याची तयारी राज ठाकरे यांनी केली. ही स्वतंत्र लढण्याची घोषणा करताना काहीही करून नेते आणि पदाधिकाऱ्यांना सत्तेत बसवणारच असं राज ठाकरे म्हणाले. यावरून दोन गोष्टी स्पष्ट होतायत. मनसे विधानसभेत स्वबळावर लढणार आणि मनसे निकालानंतर युती किंवा आघाडी करणार? अर्थात मनसेचे किती आमदार निवडून येतात आणि निकालानंतरची स्थिती काय राहिल यावर सगळं काही अवलंबून राहणार आहे. राज ठाकरेंनी केलेल्या या घोषणेवरून भाजप नेत्यांनी स्वागत केलं तर विरोधकांनी टीका केल्याचे पाहायला मिळाले.