येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला ना युत्या, ना आघाड्या… आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणार आहोत, असे म्हणत राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला. पुढे ते असेही म्हणाले, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सत्तेतील पक्ष असेल हे लक्षात ठेवावं, असा विश्वास व्यक्त करत ज्यांनी आशा अपेक्षा ठेवल्या आहेत. त्यांना उत्तम महाराष्ट्र घडवून दाखवू. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवण्याची इच्छा आहे आणि तो दाखवू असा निर्धार राज ठाकरेंनी व्यक्त केला. पुढे राज ठाकरे असेही म्हणाले, आमच्या भगिनीने बदलापूरचं प्रकरण बाहेर काढलं नसतं तर कधीच कळलं नसतं. हे सुराज्य हे स्वराज्य. हे महाराष्ट्र राज्य. ज्या राज्याकडे बघून अनेक राज्यांनी उभारी घेतली. प्रत्येकाला वाटलं महाराष्ट्रासारखं प्रगत व्हायचं तो महाराष्ट्र असा अधोगतीला चाललाय. जे मनाला येईल ते सांगितलं जातंय. जे मनाला येईल तो शब्द दिला जातोय. आगामी निवडणुकीची आचारसंहिता लागेल पण तुमचं महाराष्ट्राकडे लक्ष असलंच पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या प्रत्येक मनसैनिकाचं लक्ष असलं पाहिजे. कोणती गोष्ट कुठे घडतेय? जनतेची फसवणूक कशी होते ही गोष्ट महत्त्वाची आहे, तुमचं लक्ष असू द्या, असे म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या मनसैनिकांना भर भाषणातून आवाहन केलं.