महाराष्ट्राचा झालेला खेळ, महाराष्ट्राची सर्कस झाली आहे, कोणी विदुषकी चाळे करत आहे, कुणी मंत्रालयाच्या जाळ्यांवरून उड्या मारत आहेत. राज्यात कित्येक लोक राजकारणात अशी आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरून उड्या मारायला लावली पाहिजे, असं म्हणत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून भाष्य करून राजकीय नेते मंडळींवरच निशाणा साधला. राज ठाकरे पुढे असेही म्हणाले, ‘राजकारणात ज्या प्रकारची भाषा वापरली जाते, ज्या गोष्टींचं धरबंधन नाही अशा गोष्टी होतात तिथे त्यांना कानधरून जमिनीवर आणणं, शिकवणं सांगणं हे तुमचं कर्तव्य आहे असं वाटतं. तुम्ही त्या अधिकारवाणीने बोलू शकता, सांगू शकतो’, असं म्हणत राज ठाकरेंनी साहित्यिकांचे कान टोचले. तर आम्ही बोललो तर ट्रोल होतो असा विचार करू नका. मी आजवर जे काही बोललो, भाषण केलं, सोशल मीडियावर त्यावर काय बोललं जातं ते मी कधी वाचत नाही. त्या भानगडीत पडत नाही. माझं बोलून झालं ना, मग विषय संपला, असेही पुढे राज ठाकरे म्हणाले.