धारावीत मशिदी अनधिकृत भाग तोडण्याच्या कारवाईवरून मोठा वाद झाला आहे. मुंबई महापालिकेचे कर्मचारी हा भाग तोडण्यासाठी गेले असता पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. पालिकेच्या वाहनांची तोडफोड करून पालिका अधिकाऱ्यांना पिटाळून लावण्यात आले. त्यानंतर रास्ता रोको करत महापालिकेच्या कारवाईचा निषेधही नोंदवण्यात आला आहे. यामुळे धारावीत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. धारावीतील परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून नाक्यानाक्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या सर्व प्रकरणावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. धारावीतील प्रकरणावर गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे. धारावीतील सर्व पक्षीय प्रमुख लोक आयुक्तांना भेटले आहेत. नेत्यांना भेटले आहेत. मुंबईत यातून शांतपणे मार्ग काढले पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.