नाशिक महानगरपालिकेत ८०० कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा झाल्याचे म्हणत ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी मोठा गौप्यस्फोट केला आहे. इतकंच नाहीतर या घोटाळ्याचे लाभार्थी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा बिल्डर गट आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी त्यांच्यांवर गंभीर आरोप केलेत. दरम्यान, नाशिक पालिकेत पैशांची लूट सुरू आहे, अशी तक्रारही संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर ट्विटद्वारे आरोप करताना म्हटले की, नशिक भूसंपादन घोटाळा ८०० कोटींचा आहे. जनतेच्या पैशांची ही सरळ लूट आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या मर्जीतले बिल्डर या ८०० कोटींचे लाभार्थी असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर काय कारवाई करणार? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. तर लुटलेल्या एक एक पैस्याचा हिशोब द्यावाच लागेल, असा इशाराही राऊतांनी दिला आहे.