रत्नागिरी, ८ नोव्हेंबर २०२३ | रत्नागिरी जिल्ह्यात मध्यरात्रीपासून एसटीची हंगामी भाडेवाढ लागू होणार आहे. हंगामी भाडेवाढ लागू झाल्याने कोकणातून येणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशाला लागणार कात्री बसणार आहे. राज्य परिवहन एसटी महामंडळाकडून करण्यात येणाऱ्या हंगामी भाडेवाढीमुळे रत्नागिरी मुंबई प्रवास ५० रुपयांनी महागला आहे. रत्नागिरी-मुंबई असा प्रवास करण्यासाठी पूर्वी ५२५ रुपये लागत होते ते आता ५७५ रुपये मोजावे लागणार आहे. रत्नागिरी-बोरिवली ५५० ऐवजी आता ६०६ रूपये, रत्नागिरी-ठाणे ५०५ ऐवजी आता ५६० रुपये, राजापूर-मुंबईसाठी ५९५ रुपये आता ६५५ रुपये, लांजा-बोरिवलीसाठी पूर्वी ५५७ रुपये आता ६३५ रुपये मोजावे लागणार आहेत. ७ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर पर्यत ही दरवाढ असणार आहे. हिवाळी सुट्टीसाठी येणाऱ्या पर्यटकांना लालपरी भाडेवाढीचा मोठा झटका बसणार आहे.