मुंबई, १ सप्टेंबर २०२३ | जालन्यात मराठा आंदोलकांवर करण्यात आलेला पोलिसांकडून लाठीचार्ज या घटनेमुळे राज्यात एकच गदारोळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले आहे. मला जालन्यातून एक दोन लोकांचे फोन आले आणि त्यांनी तिथं काय घडलं ते सांगितलं. मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले होते. पोलिसांनी त्यांच्याशी विचारविनिमय केला असल्याचे सांगितले. मात्र चर्चेनंतर पोलीस बळाचा वापर करून त्यांना तिथून हुसकावण्यात आल्याचा प्रकार घडला. एकदा चर्चा केल्यानंतर लाठीचार्ज करण्याची काही गरज नव्हती मात्र अशा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे कोणते प्रश्न असले तर ते उत्तर न मिळाल्याने रस्त्यावर आले तर बळाचा वापर करावा, अशी राज्याच्या गृहमंत्र्यांची सूचना असावी, असा आरोपच शरद पवार यांनी केला आहे.