काँग्रेस आणि ठाकरे गटातील वादात शरद पवार हे मध्यस्थी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शरद पवार आज पुन्हा एकदा काँग्रेस हायकमांडशी फोनवरून संवाद साधणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, नुकतीच ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींकडून आदित्य ठाकरे यांना सवाल करण्यात आला असताना त्यांनी यावर बोलणं टाळलं असून त्यांनी यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे पाहायला मिळाले. सध्या राज्यभरातील काँग्रेसचे नेते दिल्लीमध्ये आहेत. या नेत्यांची काँग्रेसच्या हायकमांडसोबत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडूनही तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. पक्षात कोणतेही वाद झाले तर पक्षतील नेते हे शरद पवारांकडे जात त्या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न होत असतो. थोडक्यात शरद पवार हे मध्यस्थीच्या भूमिकेत असतात. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद हा टोकाला पोहोचला असताना काँग्रेस आणि ठाकरे गटातील वादावर शरद पवार मध्यस्थी करू शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.