मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केलेले एक वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. आगामी निवडणुकीत आशीर्वाद न दिल्यास तुमच्याकडचे १५०० रूपये काढून घेणार असं वक्तव्य रवी राणांनी केलं. दरम्यान, या वक्तव्यानंतर विरोधकांना सरकारवर टीका करण्याची आयती संधीच मिळाली आहे. विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर रवी राणा यांनी स्वतः केलेल्या विधानाचं स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मी केलेलं वक्तव्य हे गंमतीने केलं होतं. बहिण-भावाचं नातं जे असतं ते गंमतीचं असलं पाहिजे. मी ही तसंच वक्तव्य केलं होतं. पण विरोधक त्या वक्तव्याचा बाऊ करत आहे. मी बोललो तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकरली आहे.’, असं रवी राणांनी म्हटलं असून केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘दिवाळीनंतर या महिलांना १५०० रूपयांच्या जागी ३ हजार रूपये देण्यात यावे, असे मी मागणी करेन… तुमचा भाऊ म्हणून मी सरकारला विनंती करेन की १५०० रूपयांच्या जागी ३ हजार रूपये बहिणांना देण्यात यावे. पण हे कधी म्हणता येईल, जेव्हा तुम्ही त्यांना भरभरून आशीर्वाद द्याल’, असं रवी राणा बहिणांना म्हणाले होते.