उजनी आणि वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणातून एकादिवसात एक लाख २५ हजार क्युसेक्स तर वीरधरणातून ४१ हजार क्युसेक्स इतका विसर्ग भीमा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. अंबाबाई पटांगण येथील व्यास नारायण झोपडपट्टीतील अनेक घरात पाणी घुसल्याने झोपडपट्टीतील ३५ कुटुंबाला स्थलांतरित करण्यात आले आहे. पंढरपुरातील जुना ऐतिहासिक दगडी पूल तसेच इस्कॉन घाट पाण्याखाली गेला. भीमा नदी पात्रात असणारे कोल्हापूर पद्धतीचे सर्व बंधारे देखील पाण्याखाली गेले आहेत. तर धरण क्षेत्रात येणारा पाण्याचा विसर्ग मंदावल्याने भीमा नदी पात्रात सोडण्यात येणारे पाणी थांबवले जाण्याची शक्यता आहे. पण सध्या पंढरपुरात देखील दमदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.