नागपूर, १३ डिसेंबर २०२३ : आषाढी एकादशी किंवा कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराची चांगलीच चर्चा होतेय. मात्र आता कारण कोणतीही एकादशी नाही तर विठुरायाच्या दर्शनानंतर प्रसाद म्हणून जो लाडू भक्तांना देण्यात येतो, त्यासंदर्भात चर्चा होतेय. पंढरपुरातील विठ्ठलाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. या धक्कादायक अहवालामुळे विठ्ठलच्या प्रसादाच्या सेवनाने भक्तांच्या जीवाला धोका किंवा आरोग्याला अपाय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या लाडू संदर्भात हिवाळी अधिवेशनात लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यात आला. लाडू तयार होणाऱ्या कारखान्यात स्वच्छतेचा अभाव असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. या अहवालामध्ये असे म्हटले की, प्रसाद म्हणून देण्यात येणाऱ्या लाडूसंदर्भात गंभीर बाबी समोर आल्या आहेत. लाडू बनवण्याचे काम करतात ती जागा अस्वच्छ आहे. लाडू सुकण्यासाठी कळकट ताडपत्री वापरली जातेय. लाडूच्या पाकिटावर जे घटक लिहिले आहेत मात्र प्रत्यक्षात ते वापरलेच जात नाहीत. लाडू बनवण्यासाठी शेंगदाणा तेल वापरण्याची अट असताना सरकीचे तेल वापरले जाते. तर लाडूच्या सेवनाने भक्तांच्या आरोग्यास अपाय होऊ शकतो, असा इशारा अहवालातून देण्यात आलाय.