भारतीय संघाने पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवून इतिहास रचला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचं सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टीम इंडियाचे अभिनंदन केले आणि कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. भारतीय क्रिकेट संघाचा आम्हाला अभिमान असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर टीम इंडियाचं अभिनंदन करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला असून “चॅम्पियन! आपल्या भारतीय संघाने टी-20 विश्वचषक शानदार शैलीत पुन्हा घरी आणला! आम्हाला भारतीय क्रिकेट संघाचा अभिमान आहे. हा सामना ऐतिहासिक होता.”, असे म्हटले आहे. पुढे त्यांनी असेही म्हटले की, या शानदार विजयाबद्दल सर्व देशवासियांच्या वतीने टीम इंडियाचे खूप खूप अभिनंदन. आज 140 कोटी देशवासीयांना तुमच्या या शानदार कामगिरीचा अभिमान वाटत आहे.