नवी दिल्ली, १० ऑगस्ट २०२३ | गेल्या दोन दिवसांपासून केंद्रातील भाजप सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला. या चर्चेचा आजचा शेवटचा दिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर अविश्वास प्रस्तावावर मतदान होईल. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेत हजर झाले आहेत. अविश्वास प्रस्तावावर होणाऱ्या मतदानासह मोदी नेमकं काय उत्तर देणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच्या भाषणात मणिपूरची हिंसा, त्याची कारणे, सरकारने केलेले प्रयत्न आणि सध्याची परिस्थिती यावर भाष्य करण्याची शक्यता आहे. तसेच मणिपूरमध्ये आतापर्यंत किती नुकसान झालं? किती लोकांचा मृत्यू झाला? किती घरेदारे जाळली गेली आणि किती लोक जखमी झाले याची माहितीही मोदींकडून दिली जाण्याची शक्यता आहे.