मनोज जरांगे पाटील हे निवडणूक लढले नाही तर ते शरद पवार यांचेच आहेत, हे पक्क होईल, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं असून त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पाटील यांना शरद पवारांनी उभं केलं आहे, असही म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनीच आता त्यांच्यावर गंभीर टीका करत हल्ला चढवला आहे. प्रकाश आंबेडकरांची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा अमरावती जिल्ह्यातून अकोला जिल्ह्यात पोहोचली आहे. ही यात्रा मुर्तिजापूर येथे पोहोचल्यावर झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगेंवर जोरदार टीका केली. ‘मनोज जरांगे हा शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे, अशी चर्चा आहे. जर त्यांनी विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला नाही तर ते शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे यावर शिक्कामोर्तब होईल’, असं आंबेडकर म्हणाले आहेत.