अमरावतीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. पोलीस भरतीसाठी आलेल्या तरूणांकडून अमरावतीमध्ये आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनादरम्यान, पोलीस दलातील भरती पुढे ढकलण्याची मागणी या आंदोलक तरूणांकडून करण्यात येत आहे. राज्यात नुकतीच १७ हजार ४७१ पदांसाठी पोलीस भरती सुरू झाली आहे. राज्यातील विविध पोलीस भरती केंद्रावर पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र पावसाळा सुरू असताना कोणत्याही प्रकारची पोलीस भरती प्रक्रिया न घेता ती पुढे ढकलण्याची मागणी अमरावतीतील उमेदवारांकडून करण्यात येत आहे. मात्र सरकार भरती घेण्यावर ठाम असल्याने अमरावतीमध्ये पोलीस भरतीचे तरुण आक्रमक होत त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. काल झालेल्या पावसामुळे अमरावतीमध्ये पोलीस भरतीच्या मैदानावर चिखल झाल्याने मैदानी चाचण्या अजूनही रखडलेल्या आहेत. त्यामुळे पोलीस भरती स्थगित करून पावसाळ्यानंतर घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.