मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण केले आहे. राज ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीला जे मतदान ते मोदींविरोधात झालेलं मतदान आहे. ते मतदान महाविकास आघाडीच्या प्रेमातून झालेलं नाही म्हणजे मोदींविरोधात जो रोष होता त्याविरोधात महाविकास आघाडीला जनतेने मतदान दिलं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीत मराठी माणसाने अपेक्षेप्रमाणे मतदान केलेलं नाही तर मुस्लिम गटाकडून शिवसेना ठाकरे गटाला मतदान करण्यात आलं. त्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरे गट अर्थात ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांच्या जागा निवडून आणण्याच्या वाट्यात मुस्लिम समुदयाने केलेल्या मतदानाची मदत झाली आहे, असे स्पष्ट मत राज ठाकरे यांनी बैठकीत मांडले. तर पुढे त्यांनी असेही म्हटले की, शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव काढून घेतल्याने लोकांना ते पटलं नाही. उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत असणाऱ्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे यांना आणू नका, कारण त्यांचा महाराष्ट्रात मोठा वर्ग आजही आहे.