नवी दिल्ली, २७ फेब्रुवारी २०२४ : देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क TV9 च्या ग्लोबल समीट What India Thinks Today (WITT) च्या सत्ता संमेलनामध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी PoK बाबत भारताचा प्लॅन नेमका कसा आहे याबद्दल सारं काही सांगितलं. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर जोरदार निशाणाही साधला. तर त्यांनी ‘ए ब्रेव्ह न्यू इंडिया’ या विषयावर मनमोकळ्या गप्पा मारल्या त्यांनी पीओके, सीमेवर लष्करासमोरील आव्हानांसह इतर अनेक मुद्द्यांवर आपली मतं मांडली. राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तान हा आपला शेजारी देश असून तिथे दहशतवाद फोफावला आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना संरक्षण देत आहे. सत्तेत राहण्यासाठी पाकिस्तान आपले नापाक इरादे वाढवत आहे. जोपर्यंत या सर्व प्रवृत्ती तशाच राहतील तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कदापिही सुधारणार नाहीत, असे म्हणत पीओकेबाबत पाकिस्तानवर निशाणा साधला. पाकिस्तानने या सर्व चुका सुधारल्या तर भविष्यात दोन्ही देशांमधील संबंधांबाबत चर्चा होऊ शकते, पाकिस्तानचे राज्यकर्ते दहशतवाद्यांना प्रोत्साहन देतात. कोणत्याही स्वरूपाचा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.