ऑगस्ट महिन्यात नाशिकमधील सिन्नरच्या पंचाळे गावात आयोजित प्रवचनादरम्यान सरला बेटाचे महंत आणि गंगागिरी मठाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी एका विशिष्ट धर्माबद्दल वक्तव्य केलं. त्यावरुन मोठा गदारोळ झाला. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. आता रामगिरी महाराजांनी कोट्यवधी भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांबद्दल वक्तव्य केले आहे. साईबाबांना मुस्लिम ठरवण्याचा जो प्रयत्न केला जात आहे, तो अतिशय दयनीय आहे. साईबाबा हे मुस्लमान नव्हते. तर साईबाबा हे रामभक्त होते. शिर्डीमध्ये साईबाबांनी रामजन्मोत्सव यासह कृष्णआष्टमी सुरू केली. मग साईबाबा जर मुस्लिम होते तर मग त्यांनी रामजन्मोत्सव का साजरा केला? असा सवाल रामगिरी महाराज यांनी केलाय. ज्या ठिकाणी साईबाबा राहत होते, ती जागा मस्जिदीची जरी असली तरी त्याला ते द्वारकामाई म्हणत होते. द्वारकामाई म्हणजे भगवानकृष्णाचे भक्त… साईबाबा हे संत होते. ते संत म्हणून पूजेले जात आहे. परंतू वाराणसी याठिकाणी साईबाबांच्या मूर्त्या हटवण्याचे काम सुरू आहे त्यामागे कोणाचं तरी षडयंत्र असल्याचा आरोपही रामगिरी महाराज यांनी केला आहे.