रतन टाटा यांच्या नावाने आता पुरस्कार, उद्योग भवनालाही नाव; राज्य सरकारची सर्वात मोठी घोषणा

| Updated on: Oct 10, 2024 | 3:27 PM

टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा हे कालवश झाले आहेत. रतन टाटा यांचे बुधवारी (९ऑक्टोबर) वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेतला आहे. उद्योग क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या रतन टाटा यांच्या नावे पुरस्कार दिला जाणार आहे.

Follow us on

राज्यात उद्योग क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्याला पुढील वर्षापासून रतन टाटा उद्योग रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. यासोबतच मुंबईतील नरिमन पॉईंटजवळील उद्योग भवनाला रतन टाटा यांचं नाव देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळात रतन टाटा यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली तर राज्य शासनाच्या उद्योग क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे नाव हे रतन टाटा उद्योग रत्न पुरस्कार असणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. महाराष्ट्र सरकारने गेल्या २८ जुलै २०२३ रोजी रतन टाटा यांना महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार जाहीर केला होता. यावेळी महाराष्ट्रात काम करणाऱ्या उद्योगपतींना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून सांगण्यात आले होते. तरुण आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला असून याच पुरस्काराचे नाव आता ‘रतन टाटा उद्योग रत्न पुरस्कार’ असे असणार आहे.