महायुतीतून आणखी एक पक्षानं बाहेर पडण्याचे संकेत दिल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे सुतोवाच केलं आहे. आज रासपचा 21 वा वर्धापन दिन अकोला येथील मराठा मंडळ मंगल कार्यालयात संपन्न झाला. या कार्यक्रमात रासप पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणांमध्ये ‘एकला चलो रे’चा सूर आळवला आहे. दरम्यान यावेळी भाषणात बोलतांना महादेव जानकर यांनी देखील कार्यकर्त्यांची भूमिका उचलून धरत 288 जागांवर तयारी करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. कार्यक्रमात बोलत असताना महादेव जानकर यांनी मोठं वक्तव्य केले आहे. जर आपले 10 आमदार आले तर रासप या पक्षाचाच मुख्यमंत्री असेल, असं महादेव जानकर आपल्या भाषणात म्हणालेत. यासह महादेव जानकर असेही म्हणाले, की मराठा समाजाचे 14 मुख्यमंत्री झाल्यानंतरही आरक्षणाची मागणी होतेय. ती का होतेय?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थितीत केला आहे.