पंतप्रधान मोदी यांनी 2016 मध्ये अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बांधू अशी घोषणा केली होती. मात्र या घटनेला 8 वर्ष उलटून गेल्यानंतर अद्याप या स्मारकाचे काम सुरु झालेले नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वशंज आणि स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे आक्रमक झाले आहे. आज छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबईत दाखल होत अरबी समुद्रात जाऊन स्मारकाची पाहणी करण्यासाठी रवाना होणार होते. दरम्यान, यावेळी पोलिसांकडून संभाजीराजे आणि त्यांच्या स्वराज पक्षाचे कार्यकर्ते गेट वे ऑफ इंडियाला पोहोचताच रोखण्यात आलं. इतकंच नाहीतर कार्यकर्त्यांची धरपकडही करण्यात आली. यावेळी संभाजीराजे चांगलेच संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. पण अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम का सुरु झाले नाही? असा सवाल त्यांनी केला. गुजरातमध्ये सरदार पटेल यांचा पुतळा उभा राहिला पण 8 वर्षांनतंरही छत्रपतींचा पुतळा उभारला गेला नाही? छत्रपती शिवाजी महाराजांचे नावाचे राजकारण खूप झाले, या प्रकरणात आता खोटे खपवून घेणार नसल्याचे संभाजीराजे म्हणाले.