मुंबई, १३ ऑक्टोबर २०२३ | रेल्वेची सुरक्षा यंत्रणा अत्याधुनिक करण्यात आली आहे. यंत्रणा खरोखरच इतकी आधुनिक झाली असेल तर रेल्वेच्या दुर्घटना वारंवार का घडत आहेत? असा सवाल करत सामनातून थेट मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. बिहार रेल्वे अपघातावरून सामानातून केंद्र सरकारला हा जाब विचारण्यात आला आहे. वाढते रेल्वे बळी या शीर्षकाखाली सामनातून केंद्रावर धारेवर धरण्यात आले आहे. आधी बालासोरमध्ये तीन रेल्वेगाडय़ा एकमेकांवर आदळून 295 प्रवासी मृत्युमुखी पडले. आता बिहारातही रेल्वेचे 21 डबे रुळावरून घसरल्याने सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. प्रवाशांचा जीवनप्रवासच थांबवणारे हे वाढते ‘रेल्वे बळी’ सरकारच्या दुर्लक्षाचे आहेत की रेल्वे प्रशासनाच्या आधुनिकीकरणाचे, हे आता सरकारनेच सांगावे! असे म्हणत केंद्राला सवाल केला आहे.