लोकसभा निवडणुकीत नाव न घेता पाडलं, आता विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या २८८ जागांवर नाव घेऊन पाडणार असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं असून त्यांनी सरकारला थेट इशारा काल दिला आहे. यावर शिवसेना महिला आमदार मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला पुढे आणण्यासाठी मनोज जरांगे पाटील विधानं करतात की काय? माहित नाही पण सातत्याने मनोज जरांगे पाटील करत असलेल्या विधानामुळे कळत नकळतपणे मराठा समाजाची बदनामी होतेय, असं मत मनीषा कायंदे यांनी व्यक्त केलं. तर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या शब्दांना आवर घालावा, असा खोचक सल्लाही मनीषा कायंदे यांनी त्यांना दिला. सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आहे. त्यात मराठा समाजाचं भलं होणार आहे. त्यामुळे ओबीसी नेते असो की मराठा नेते त्यांनी अशी टोकाची भूमिका घेऊन समाजातील वातावरण बिघडवू नये, असे आवाहनदेखील मनीषा कायंदे यांनी केलं आहे.