‘राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे चार साडेचार वर्षे एका कोषात जातात अन्…’, सुषमा अंधारेंची बोचरी टीका

| Updated on: Oct 14, 2024 | 1:45 PM

उद्धव ठाकरे हे इतिहासाताच रमतात. त्यातून ते बाहेर पडत नाहीत. कधी तरी वास्तवात या, सारखी वाघनखं काढतो, इथून अब्दाली आला, तिथून अफजलाखान आला, अरे महाराष्ट्राबद्दल बोल, अशी खोचक टीका राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती. गोरेगाव येथे झालेल्या मनसेचा कार्यकर्ता मेळाव्यातून त्यांनी हा निशाणा साधला. यावर सुषमा अंधारेंनी पलटवार केलाय.

Follow us on

‘सजीव सृष्टीमध्ये अनेक वेगवेगळे जीव आहेत. यात काही हायबरनेटिव्ह प्रकारचे काही प्राणी असतात. जे हायबरनेशनमध्ये 8-9 महिन्यांचा कालावधी घालवतात आणि जेव्हा त्यांना अनुकूल ऋतू येतो, तेव्हा ते बाहेर पडतात. त्यांची उपजीविका आणि इतर काही गोष्टी शोधतात. राजकारणात सुद्धा असे काही राजकीय सस्तन प्राणी आहेत. जे चार साडेचार वर्षे एका कोषामध्ये जातात आणि निवडणुकांचा हंगाम आला की ते बाहेर पडतात. बाहेर पडून अचानक आपण वेगळ्याचं ध्रुवावरून आलेलो आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. अशांपैकी एक म्हणजे राज ठाकरे साहेब’, असं वक्तव्य करत सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. पुढे त्या असेही म्हणाल्या की, ते इतिहासाबद्दल बोलत होते. त्यांना धारावी म्हणजे इतिहास वाटतोय का? धारावीतली माणसे म्हणजे त्यांना हडप्पा मोहंजोदडोमध्ये गडप झालेली संस्कृती वाटते. सध्या ते कशाही प्रकारची विधाने करत आहेत. बोलतात बोलतात आणि म्हणतात माझ्या हातात सत्ता द्या. सत्ता द्यायला पण काही हरकत नाही, पण पुढचे चार साडेचार वर्ष पुन्हा ते हायबरनेशनमध्ये गेले तर ती साडेचार वर्ष कोणाच्या भरवशावर काढायची?.. हा एक वेगळाच प्रश्न, असा चिमटा काढतानाच राज साहेब गेटवेल सून.. मला आपली काळजी आहे, असी खोचक टीकाही सुषमा अंधारे यांनी केली.