एसटी कर्मचाऱी कृती समिती आणि मंत्री उदय सामंत यांची राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाच्या मुद्यावरून बैठक झाली. याबद्दल एसटी कर्मचाऱी कृती समिती अध्यक्ष संदीप शिंदे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘उदय सामंत म्हणाले की, मी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलतो. मात्र आता आंदोलन मागे घ्या. मात्र गेल्या वेळेची परिस्थिती त्यांना सांगितली त्यामुळे आम्ही आज आंदोलन मागे घेणार नाही’, असे संदीप शिंदे यांनी सांगितले यावेळी त्यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली का? असा सवाल माध्यम प्रतिनिधींनी केला असता संदीप शिंदे म्हणाले, दिशाभूल काय? एसटी कामगार चळवळीला लागलेला काळा डाग म्हणजे वकील गुणरत्न सदावर्ते आहे. फक्त मोठ्यानं ओरडायचं, एसटी कर्मचाऱ्याचं काय वाटोळं करायचं राहिलंय? एसटी कर्मचाऱ्यांच्या सोन्यासारखी एसटी बँकेचं वाटोळं केलं. केवळ भुंकत राहायचं. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते एसटी कर्मचारी आंदोलनाला लागलेला ‘डाग’ आहे, असे म्हणत त्यांनी सदावर्तेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. तर ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यात त्या सदावर्तेंमुळेच झाल्यात, असा आरोपही संदीप शिंदे यांनी केला.