सध्या पावसाळ्याचा हंगाम सुरू झाल्याने बरेचसे हौशी पर्यटक पर्यटनासाठी घराबाहेर पडतांना दिसताय. अशातच पावसाळी पर्यटनासाठी अनेकजण ताम्हिणी वन्यजीव अभयारण्याला आवर्जून भेट देतात. पावसाळ्यातील जंगलभ्रमंतीसाठी पर्यटकांची ताम्हिणी अभयारण्यला मोठी पसंती मिळत असते. परंतु, ताम्हिणी वन्यजीव अभयारण्य हे क्षेत्र अपघातप्रवण असल्याने या ठिकाणी पर्यटकांना ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. पावसाळ्यातील अपघात टाळण्यासाठी वन विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. तर वर्षा पर्यटनावेळी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असं वन विभागाकडून पर्यटकांना आवाहन करण्यात आले आहे. ताम्हिणी वन्यजीव अभयारण्यातील प्लस व्हॅलीमध्ये पावसामुळे निसरड्या झालेल्या वाटांवर होणाऱ्या अपघाताचा धोका लक्षात घेऊन वन्यजीव विभागामार्फत निसर्गवाटा २८ जून २०२४ ते ३० जून २०२४ पर्यंत पर्यटनासाठी बंद करण्यात आल्या आहेत.