मुंबई, ११ ऑगस्ट २०२३ | राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विटच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी गुन्हेगारीच्या घटनेवर बोटं ठेवले आहे. ‘मिंधे-भाजप सरकार कधी गणपती बाप्पाच्या मिरवणूकीत बंदूक काढणारं असतं, कधी पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करणारं असतं, तर कधी उद्योजकांना ॲाफिसमध्ये बंदूकीचा धाक दाखवणारं, तर कधी भर रस्त्यात पत्रकारांना मारझोड करणारं असतं… हे खोके सरकार महाराष्ट्रात गुंडगिरी करणारं असतं… महिलांना शिवीगाळ करणारे निर्लज्ज लोक मंत्रीपदावर बसतात आणि मिंधे मुख्यमंत्री त्यावर मूग गिळून गप्प बसतात! राज्यकर्ते म्हणून हे असे लोक शोभतात का?’ असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केलाय, तर महाराष्ट्र हे प्रकार पाहतोय, लक्षात ठेवतोय! आता आम्ही महाराष्ट्रप्रेमी तुमची हुकूमशाही आणि गुंडगिरी संपवणारच, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी थेट इशाराच दिला आहे.