मुंबई, २५ ऑक्टोबर २०२३ | उद्धव ठाकरे यांच्यावर बोलल्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मार्केट चालत नाही. कारण शिंदे गटाला मार्केट शिल्लक राहिलेले नाही, असे म्हणत ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी खोचक टीका केली आहे. तर आझाद मैदानावर झालेला शिंदे यांचा मेळावा हा शिंदे गटाचा म्हणता येणार नाही तो खरा भाजपचा मेळावा झाला असे म्हणता येईल. तो बिर्याणीचा मेळावा होता. त्या मेळाव्यात पैसे देऊन आणलेले लोकं होती. तिथे जमलेली लोकं ही दसरा मेळाव्यासाठी नाहीतर मजा मस्ती करण्यासाठी लोकं गोळा केली होती, असे म्हणत शरद कोळी यांनी सडकून टीका केली. तर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून त्यांनी शरद पवार यांच्याकडे दोन जण पाठवले अशी टीका शिंदे गटाकडून करण्यात आली होती. यावर शरद कोळी म्हणाले, त्यांना जर मुख्यमंत्री व्हायचं असतं तर 40-50 वर्षे ते आमदार म्हणून राहू शकले असते. सर्व हातात असताना त्यांनी मुख्यमंत्री असावं, असा विचार केला नाही. शिवसेना सत्तेची भुकेली नाही, तर यांना सत्ता पाहिजे, असे म्हणत त्यांनी हल्लाबोल केला.