शिवरायांच्या पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी वापरले असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते, आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजनमधूनही साडे पाच कोटी रूपये खर्च करण्यात आल्याचे वैभव नाईक यांनी म्हटले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये डिझेलसाठी जिल्हा नियोजनमधून पैसे दिले असल्याचा आरोपही वैभव नाईक यांनी केला आहे. ‘ज्या ठिकाणी नौसेनेचा कार्यक्रम असतो त्यावेळी नौसेनेकडून संपूर्ण कार्यक्रमाचा खर्च केला जातो. मात्र मालवण येथील मोदींच्या कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजनमधून साडे पाच कोटी रूपये खर्च करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे’, असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे. इतकंच नाहीतर हा भ्रष्टाचार करून नारायण राणे यांच्या निवडणुकीसाठी जनतेत पैसे वाटप करण्यात आले, असा गंभीर आरोप वैभव नाईक यांनी केला.