मुंबई, १ मार्च २०२४ : मोदी गॅरंटीशी येणारी निवडणूक लढता येईल का? असा सवाल संजय राऊत यांना केला असता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. राऊत म्हणाले, मोदींकडे काय आहे. रामाची लहर आहे. कुठे आहे रामाची लहर, राम काय त्यांच्या सातबाऱ्यावर रामाचं नाव लिहिलंय का. मोदींनी काय केलं. त्यांची दहा कामे दाखवा जी त्यांची स्वतची आहे. यूपीए केलेल्या काळात केलेली कामांचं उद्घाटन करत फिरत आहे. अटल सेतू काँग्रेसच्या काळातील आहे. स्वतची पोरं दाखवा. दुसऱ्यांच्या पोरांना तुमची नाव देऊ नका, असे म्हणत राऊतांनी सडकून टीकाही केली. तर कोणतंही चिन्ह नसताना निवडणूक कशी लढणार यावर बोलताना राऊत म्हणाले, चिन्ह घेतलं म्हणजे तुम्ही बादशाह होत नाही. जिथे ठाकरे तिकडे शिवसेना, जिथे शरद पवार तिथे राष्ट्रवादी कुणी ऐरागैरा येतो पक्षावर चिन्हावर दावा सांगतो. दरोडा टाकतो. त्या दरोड्याला निवडणूक आयोग मदत करतात. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांनी पक्षाला जन्म दिला का. सर्वोच्च न्यायालयानेही सांगितलं आहे. जनताही पाहत आहे. देशातील जनतेला कळतंय. शरद पवार हयात आहे, आणि अजित पवार पक्षावर दावा सांगत आहे. निवडणूक आयोगही देत आहे. ही काय पाकिटमारी आहे का? असा थेट राऊतांनी करत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीकास्त्र डागलं.