मुंबई, २४ सप्टेंबर २०२३ | नुकतंच नव्या संसदेच्या भवनात पहिलं विशेष अधिवेशन पार पडलं. दरम्यान, या नवीन संसद भवनाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’तील रोखठोक या सदरातून जोरदार हल्लाबोल केला आहे. जुनं संसद भवन मजबूत असताना आणि त्याला काहीच धोका नसताना नवीन संसद भवन उभारण्याची गरज काय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थितीत केला आहे. इतकंच नाहीतर पंतप्रधान पद टिकावं म्हणून ज्योतिषाच्या सल्लानुसार हे नवीन संसद भवन उभारल्याचा मोठा गौप्यस्फोटही संजय राऊत यांनी केल्याचे पाहायला मिळत आहे. दहा वर्षापेक्षा अधिक काळ सध्याच्या संसद भवनात कोणीही टिकत नाही. त्यामुळे सध्याचे संसद भवन तुम्हाला धार्जिणे नसल्याने नव्या संसदेची निर्मिती करा, असा सल्ला ज्योतिषांनी दिला आणि घाईत नवे संसद उभारल्याचे संजय राऊत यांनी म्हणत टीका केली.