काँग्रेस आणि ठाकरे गटात जागा वाटपावरून वाद असताना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस तर संजय राऊत यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी एका माध्यमानं दाखवली आणि संजय राऊत भडकले. भाजपच्या भेटीची बातमी चुकीची असून आमच्यावर शंका घेणारे एका बापाची औलाद नाहीत मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, असा हल्लाबोलच संजय राऊत यांनी केला आहे. भाजपसोबत जाण्याचा संबंधच नाही. भाजपशी हात मिळवणी म्हणजे औरंगजेबाशी हात मिळवणी करण्यासारखं आहे, असं संजय राऊत म्हणाले. तर दुसरीकडे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या जागा वाटपाचा वाद मिटवण्यासाठी शरद पवार यांनी मध्यस्थी केल्याचे पाहायला मिळतंय. आधी आदित्य ठाकरे आणि अनिल परबांनी काँग्रेसच्या भूमिकेची माहिती शरद पवारांना दिली. त्यानंतर शरद पवारांनी काँग्रेसच्या हायकमांडशी संपर्क साधला. रात्री उशिरापर्यंत जयंत पाटील मातोश्रीवर होते. दरम्यान, आता तिढा असलेल्या जागांवर महाविकास आघाडीची पुन्हा बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे.