मुंबई, १ डिसेंबर २०२३ : जो माणूस स्वतःच्या घराची काळजी न करता बेपर्वाहीने दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जातो, असा माणूस राज्याचा कारभार करण्यासाठी नालायक आहे, असं वक्तव्य दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. यानंतर आज पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडून नालायक या शब्दाचा पुन्नरूच्चार झाल्याचे पाहायला मिळाले. आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा सरकारवर हल्ला चढवला. नालायक हा शब्द त्यांना बरोबर लागला आहे. राज्यातील शेतकरी काय म्हणायचं ते म्हणतील पण त्यांना संपूर्ण कर्जमूक्ती करा, नाहीतर सरसकट सगळ्यांना नुकसान भरपाई देऊन न्याय मिळवून द्या, अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे केली. तर कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवरून उद्धव ठाकरे म्हणाले, या बैठकीत तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, नवीन यात काय केलं? असा सवाल करत सुरू असलेली थेरं बंद करा, असे म्हणत उद्धव ठाकरे सरकारवर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.