महाराष्ट्रात महाविकास आघाडीला १५८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीला केवळ १२७ जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे, असा अंदाज टीव्ही 9 मराठीच्या पोलनुसार समोर आला आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, १५० ते १५८ जागांचा कौल आमच्या बाजूने दिसत असला तरी आम्हाला सावधपणे काम करावे लागणार आहे. आमच्या अपेक्षा १८० ते १८५ जागा जिंकण्याची आहे आणि तशी आम्ही तयारी करत आहोत, असे वक्तव्य करत असताना कोणत्याही परिस्थिती महाविकास आघाडीचं सरकार येईल. असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. तर लोकसभेच्या वेळी आम्ही म्हणत होतो, महाराष्ट्रात आम्ही ३०-३१ जागा जिंकू तेव्हा समोरचे लोकं आम्हाला हसत होते. इतक्या जागा जिंकून दाखवा मिश्या काढून फिरेन, संन्यास घेईन, असे म्हटले होते… पण आम्ही ३०-३१ जागा जिंकून दाखवल्या. काही जागा त्यांनी चोरल्या, असा आरोपही संजय राऊत यांनी केला. पुढे ते असेही म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी आता राजीनामा देऊ नये, त्यांनी त्यांच्या पदावर रहावं, कारणं विधानसभेच्या निकालानंतर त्यांना पदावरून जावंच लागणार आहे. त्यावेळी त्यांना कोणीच थांबवणार नाही, असा खोचक टोलाही संजय राऊतांनी फडणवीसांना लगावला.