नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील चार दिवसापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव, माहुर, अर्धापूर, नांदेड, मुदखेड या तालुक्याला या अवकाळी पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका अर्धापूर तालुक्याला बसला आहे. अर्धापूर तालुक्यात केळीचे पीक मोठ्या प्राणावर घेतलं जात. येथील शेतकऱ्यांचं केळी हे प्रमुख पीक आहे. परंतु यंदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हाता-तोंडाशी आलेल केळीचं पीक पूर्णतः वाया गेलं आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. बुधवारी रात्री आणि गुरुवारी सायंकाळी अर्धापूर तालुक्यात मोठ्या प्रामाणावर अवकाळी पाऊस आणि गारपिट झाली. या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने केळीचे पीक आडवे पडले आहे. सरकारने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी आता शेतकरी करीत आहेत.