परभणी : गेल्या दोन आठवड्यापासून परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाने जिल्ह्यातील आंब्याच्या पिकाचे मोठ्यप्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील पूर्णा, जिंतूर आणि मानवत तालुक्यातील अनेक गावाच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना अस्मानी संकटामुळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे या भागातील आंबा उत्पादक शेतकरी हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस, गारपीट होत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील जळगाव, नांदेड, अमरावती, बीड, नाशिक या जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेलं पीकं अवकाळी पावसाने वाया गेल्यानं बळीराजा हवालदिल झाला आहे. अशातच आता अंब्याचा हंगाम असताना आंब्याचा मोहोर गळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने बळीराजा चिंतेत आहे.