केंद्रात मोदी सरकार आलं नसतं तर अजित पवार महायुतीतून बाहेर पडले असते, असा खळबळजनक मोठा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. पुढे विजय वडेट्टीवार असेही म्हणाले की, अजितदादांच्या सर्व प्रकारच्या चौकशा बंद झाल्या आहेत. प्रफुल्ल पटेल यांचं ईडी प्रकरण बंद झालं आहे, छगन भुजबळांचंही तेच झालं आहे. सत्तेत जाऊन आपली प्रकरण फाईल करून ते परत येत असतील तर ही नवी आयडिया आहे, असा खोचक टोलाही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांची पुढच्या महिन्याभरात घरवापसी होणार आहे, अशी परिस्थिती राज्यात आहे. ते आमदार संपर्क साधत असल्याची माहिती आहे. वस्तुस्थिती नेमकी काय आहे माहिती नाही मात्र यासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.