बचत गटांसोबत काम करणाऱ्या लक्षावधी महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ घेता येणार आहे. वयवर्ष १८ ते ५० वर्ष वयोगटातील महिला सरकारच्या लखपती दीदी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. महिलांना स्वयं रोजगार सुरू करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी १ ते ५ लाख रूपयांचं कर्ज देण्यात येणार आहे. ज्या महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या महिलेने राज्यातील मूळ रहिवासी असणं आणि बचत गटात सहभागी होणं बंधनकारक असणार आहे. जळगावील कार्यक्रमात ११ लाख लखपती दीदींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. लखपती दीदी योजनेंतर्गत २ हजार ५०० कोटी रूपयांच्या निधीचं वाटप केलं जाणार आहे. बचत गटातील महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन लखपती दीदी करण्याचा प्रयत्न असणार असून योजनेद्वारे २ कोटीवरून ३ कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचं उद्दिष्ट आहे.