Edible Oil Price : सणासुदीच्या काळात मिळणार दिलासा? खाद्यतेलाच्या किंमतींचा काय सांगावा

| Updated on: Sep 05, 2023 | 3:36 PM

Edible Oil Price : खाद्यतेलाच्या किंमती सध्या स्थिर आहेत. सणासुदीच्या काळात खाद्यतेलात वाढ होण्याची शक्यता आहे की या किंमती जैसे थे राहतील , कमी होतील याविषयी लोकांच्या मनात आतापासूनच प्रश्न उठत आहेत. याविषयीची वार्ता समोर येत आहे.

Edible Oil Price : सणासुदीच्या काळात मिळणार दिलासा? खाद्यतेलाच्या किंमतींचा काय सांगावा
Follow us on

नवी दिल्ली | 5 सप्टेंबर 2023 : सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे का? असा प्रश्न ग्राहकांना आतापासूनच पडत आहे. जुलै, ऑगस्ट महिन्यातील महागाईने कळस गाठला. त्यात केवळ खाद्यतेलाने आग ओतली नाही. भाजीपाल्यापासून ते सर्वच वस्तू, खाद्यपदार्थ महागले. डाळी, धान्य महागले. आता ऐन सणासुदीत तेलाने (Edible Oil Prices in Festival Season) उरलीसुरली कसर काढू नये अशी भीती नागरिकांना वाटत आहे. झटपट विक्री होणाऱ्या उत्पादन करणाऱ्या कंपन्या (FMCG) यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचेच लक्ष लागेल आहे. सध्या खाद्यतेलाच्या किंमती स्थिर आहेत. त्यात मध्यंतरी बरीच घसरण झाली. पण दिवाळीच्या काळात साठेबाज व्यापारी भाव वाढवणार तर नाही ना? असा प्रश्न ग्राहकांना सतावत आहे.

कंपन्यांचे म्हणणे काय

यंदा देशात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीनसह इतर तेलवर्गीय पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीपातील तेलबिया वर्गीय पीकाचे उत्पादन घटू शकते. पण एफएमसीजी कंपन्याच्या अंदाजानूसार जागतिक पातळीवरील पुरवठा साखळी मजबूत असल्याने खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ होणार नाही.

हे सुद्धा वाचा

पण दर वाढू शकतात

सध्या सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचा भडका उडणार नसला तरी डिसेंबरनंतर खाद्यतेलाचे भाव भडकण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी मार्च-एप्रिलपर्यंत चढ्या दराने खाद्यतेलाची विक्री होऊ शकते. या काळात उत्पादन घसरल्याचा फटका बसू शकतो. या काळात उत्पादन कमी झाल्याने दरवाढ होऊ शकते.

खाद्यतेलाचे भाव का नाही भडकणार

ईटीच्या अहवालानुसार, सॉलव्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशनचे कार्यकारी संचालक बी व्ही मेहता यांनी यामागील कारणमीमांसा केली. त्यानुसार सोयाबीन आणि भूईमुगासाठी हवा तेवढा पाऊस झाला नाही. पावसाने खंड पाडला. येत्या काही दिवसात पावसाने जोर धरला तर ही स्थिती निवळेल. काही भागात पावसाने साथ दिली आहे. पण असेच वातावरण राहिल्यास काही दिवसांनी उत्पादनावर परिणाम होऊन ते घटू शकते. तर भारताने यावेळी आयात तेलावर अधिक जोर दिला आहे. त्यामुळे बाजारात किंमती घसरल्या आहेत. पावसाने पळ काढल्यास सोयाबीन आणि इतर तेलबिया पिकांवर प्रतिकूल परिणाम दिसेल. त्याचा फटका डिसेंबरनंतर बसेल.

डिसेंबरपासून वाढतील दर

भारतीय हवामान विभागानुसार, देशातील 717 पैकी 287 जिल्ह्यांमध्ये 1 जून ते 4 ऑगस्ट या दरम्यान पावसाचे प्रमाण घसरले आहे. पाऊस कमी झाल्याने तांदळासह इतर अनेक पिकांना फटका बसला आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत ग्राहकांना खाद्य तेलासह इतर वस्तूंसाठी अधिक खर्च करावा लागू शकतो. केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्यास त्यावेळी पण भाव कमी होऊ शकतात.