‘आम्ही उद्योगपती, व्यापारी नाही’, Ratan Tata यांनी धनदांडग्यांना असा शिकवला धडा, नफ्याच्या लालसेत चांगुलपणा न विसरण्याचा दिला मंत्र

| Updated on: Oct 10, 2024 | 12:41 PM

Ratan Tata Valuable Advice : रतन टाटा हे भारतीय उद्योग जगतातील पितृतुल्य व्यक्तिमत्व. आज अनेक तरुण, नवउद्योजकांचे ते हिरो आहेत. त्यांच्या आदर्श विचारावर चालण्याचा अनेक जण प्रयत्न करत आहेत. रतन टाटा स्वतःला एक उद्योजकच मानत होते. त्यांची साधी राहणी आणि समाजासाठी काही करण्याचा प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

आम्ही उद्योगपती, व्यापारी नाही, Ratan Tata यांनी धनदांडग्यांना असा शिकवला धडा, नफ्याच्या लालसेत चांगुलपणा न विसरण्याचा दिला मंत्र
रतन टाटा यांचा महत्त्वाचा धडा
Follow us on

व्यापारी हा नेहमी पैशांच्या मागे धावतो, त्याला नफा कमवायचा असतो. तर उद्योजकाला नफ्यापेक्षा लोकांच्या भल्याचा विचार असतो. हे सांगण्याचे कारण म्हणजे, काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात रतन टाटा यांनी व्यापारी आणि उद्योजकामधील अंतर समजावून सांगितले होते. ‘आम्ही उद्योगपती, व्यापारी नाही, त्यामुळे नफा हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा नाही. आमच्यासाठी देश आणि समाजाचं कल्याण महत्त्वाचं आहे’, असे विचार त्यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले. त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट थांबला नाही. आज रतन टाटा आपल्यात नाहीत, पण त्यांच्या विचारांचा मोठा वारसा ते आपल्याकडे ठेवून गेले आहेत. त्यांनी असे धडे शिकवले की त्यातून एक चांगला समाज घडू शकतो.

रतन टाटा यांच्या निधनाने देशभरात शोक व्यक्त होत आहे. त्यांना अत्यंत जवळून पाहणाऱ्यांना त्यांचं साध राहणीमान भावलं. मोठे गुंतवणूकदार वल्लभ भंसाली यांनी CNBC आवाजाशी बोलताना सांगितले की रतन टाटा हे नेहमी दूरचा विचार करत होते. छोट्या छोट्या नफ्याकडे लक्ष न देता काही तरी धोरण आखून त्यावर काम करत असत. त्यांनी रतन टाटा यांचा हा किस्सा त्यावेळी सांगितला. आम्ही उद्योगपती आहोत, व्यापारी नाही. आम्हाला असे निर्णय घ्यावे लागतील, जे येत्या काही वर्षात देश आणि समाजाला मोठा लाभ पोहचवतील. त्यांना लाभ होईल. आपल्याला व्यापाऱ्याप्रमाणे छोट्या-मोठ्या लाभाकडे लक्ष्य देण्याची गरज नाही, असे टाटा म्हणाल्याची आठवण त्यांनी जागवली.

नफा नाही, पुढची दृषी समोर ठेवा

हे सुद्धा वाचा

उद्योगपती आणि व्यापारी यांच्यामधील अंतर काय हे रतन टाटा यांनी समजावून सांगितले. ते केवळ उदाहरण देऊन थांबले नाहीत. तर 1981 मध्ये टाटा इंडस्ट्रीजच्या अध्यक्ष पदी असताना एक खास धोरण राबवले. त्यांनी मोठ्या उद्योगात अनेक बदल केले. त्याचा पुढे देशाला फायदा झाला. उद्योगात जोखीम घ्यायला ते कधी कचरले नाहीत. त्यांनी नव उद्योजकांना जोखीम घेण्यास सांगितले. रतन टाटा यांनी अनेक जागतिक कंपन्यांचे अधिग्रहण करताना हीच दूरदृष्टी उपयोगात आणली.

सर्वसामान्यांच्या चारचाकीचे स्वप्न साकार

प्रत्येक भारतीयाकडे स्वतःची कार असावी असे स्वप्न रतन टाटा यांनी उराशी बाळगले होते. त्यांनी त्यातूनच 2008 मध्ये नॅनो कारचे स्वप्न पूर्ण केले. त्या प्रकल्पात नफातोट्याचे गणित त्यांनी पाहिलेच नाही. त्यांचे एकच स्वप्न होते की सर्वसामान्यांसाठी एक किफायतशीर कार असावी. ते स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात उतरवले. त्यांनी उद्योगातील 60 टक्के भाग टाटा ट्रस्टला देण्याचे धोरण स्वीकारले होते.