नातेवाईकच जीवावर उठला, 2 सख्ख्या भावांना संपवलं, बीड हादरलं

| Updated on: Jan 17, 2025 | 11:46 AM

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या झाली आहे. त्यांच्या नातेवाईकानेच चाकूने हल्ला करून त्यांचा खून केल्याचे समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे. मृतांची नावे अजय आणि भरत भोसले अशी आहेत.

नातेवाईकच जीवावर उठला, 2 सख्ख्या भावांना संपवलं, बीड हादरलं
crime news
Follow us on

बीड मधील आष्टी तालुक्यातील वाहिरा परिसरात दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने मोठी खळबळ माजली आहे. पारधी समजातील दोघांची हत्या झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या दोन तरूणांच्या नातेवाईकानेच त्यांचा निर्घृणपणे चाकूने खून केल्याचे समोर आले आहे. यामुळे आष्टी तालुक्यातील वाहिरा भागातील नागरिकांमध्ये दहशतचे वातावरण असून ते जीव मुठीत धरून जगत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजय भोसले ( वय 30) आणि भरत भोसले ( वय 32) अशी मृत तरूणांची नावे आहेत. अजय आणि भरत यांचा त्यांच्या एका नातेवाईकासोबत जुना वाद होता. आणि याच वादातून रात्री निर्घृणपणे या दोघांची हत्या झाली. दोघे भाऊ नगर हद्दी वरील हातवळण या मूळ गावचे आहेत. या गावापासून पाच किलोमीटर अंतरावर वाहीरा गावच्या परिसरात या दोघांची हत्या झाली. वादातून त्यांच्या नातेवाईकानेच त्यांच्यावर चाकूने हल्ला केला आणि त्यांचा जीव घेतला. यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

अजय आणि भरत या दोघांचे मृतदेह आष्टी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून पोस्टमॉर्टम करण्यात येईल. या प्रकरणी संशयित चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अंभोरा पोलीस अधिक तपास करत आहेत. खून नेमका कधी , कसा केला, काय वाद होता याची पोलिसांकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.

धाराशिवमध्ये पारधी समाजात हिंसा

दरम्यान, याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात विहिरीचे पाणी शेतात वाटपावरून दोन गटात झालेल्या मारामारीत तीन जणांना जीव गमवावा लागला, तर चौघे जखमी झाले. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील बावी गावात ही घटना घडली. पारधी समाजातील दोन प्रतिस्पर्धी गटांमध्ये हिंसा झाली होती.  त्यानंतर झालेल्या भांडणात तिघांनी जीव गमावला तर उर्वरित चौघे जखमी झाले.