Pune Accident : दोघांना चिरडणाऱ्या ‘त्या’ अल्पवयीन मुलाचे वडील ताब्यात, संभाजीनगरमधून पोलिसांनी केली अटक

| Updated on: May 21, 2024 | 9:15 AM

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघाताने संपूर्ण शहरात खळबळ माजली. एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. मात्र आरोपी मुलांना अवघ्या काही तासांतच जामीन मिळाला.

Pune Accident : दोघांना चिरडणाऱ्या त्या अल्पवयीन मुलाचे वडील ताब्यात,  संभाजीनगरमधून पोलिसांनी केली अटक
Follow us on

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघाताने संपूर्ण शहरात खळबळ माजली. एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. या अपघाताला जबाबादर अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्रांना पोलिसांनी अटक केली, मात्र काही तासांतच त्याची जामीनावर सुटका झाली. आता याप्रकरणी आणखी मोठे अपडेट समोर आले आहे. या अपघातातील अल्पवयीन आरोपीचे वडील , विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.

विशाल अग्रवाल यांचा मुलगा अल्पवयीन असल्याने काल वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र त्यानंतर विशाल अग्रवाल गायब झाले होते. अखेर पुणे पोलिसांनी रात्रीतून शोधून काढलं आणि अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिस अवलिया आणि अश्विनी कोस्ता अशी मृतांची नावे आहेत. अश्विनी हिचा जागीच मृत्यू झाला तर अनिस अवलिया याने हॉस्पिटलमध्ये उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला. दोघेही राजस्थनामधील होते. शनिवारी रात्री अश्विनी आणि अनिस हे दोघेही त्यांच्या मोटारसायकल वरून कल्याणीनगरकडून येरवड्याकडे मित्रांसह जात होते. त्यावेळी अग्रवाल यांच्या मुलाची पोर्शे ही आलिशान कार याच रस्त्याने भरधाव वेगात निघाली होती. कारमधील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर या गाडीने मोटारसायकल आणि इतर वाहनांना धडक दिली. यामध्येच दोघांचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

नोंदणीविनाच कार रस्त्यावर

दरम्यान ज्या पोर्शे कारने त्या दुचाकीस्वारांना धडक बसली ती कार नोंदणीविनाच रस्त्यावर धावत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. आरटीओकडून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. बंगळुरूमध्ये तात्पुरती नोंदणी करून ही कार पुण्यामध्ये आणण्यात आली होती. पुण्यातील आरटीओ कार्यालयात या कारची नोंदणी प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही.

आरोपीला जामीन, शिक्षा काय तर निबंध लिहा

दरम्यान दोघांचा जीव जाण्यास कारणीभूत ठरलेल्या त्या अल्पवयीन आरोपीला काही तासांतच जामीन देण्यात आला. विशेष म्हणजे जामीन देताना न्यायालयाने त्याला जी शिक्षा दिली आहे, त्यामुळेही संताप व्यक्त होत आहे. आरोपीला शिक्षा काय तर अपघात या विषयावर ३०० शब्दांचा निबंध लिहा. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या या मुलाला कोर्टाने ठोठावलेल्या शिक्षेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

१) आरोपीला 15 दिवस येरवडा विभागातील पोलिसांसोबत ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी मदत करावी लागेल. तसेच वाहतूक जागृतीचे फलक रंगवावे लागतील

२) आरोपीला मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार घ्यावे लागतील.

३) भविष्यात आरोपीने कोणताही अपघात पाहिला तर त्याला सर्वप्रथम अपघात ग्रस्तांची मतद करावी लागेल. ४) रस्ते अपघाताचे परिणाम आणि त्यावरील उपाय या विष्यावर आरोपीला कमीत कमी 300 शब्दांचा निबंध लिहावा लागेल.

या अटींवर त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.