श्रद्धा-आफताब यांचा वाद पैशांच्या ठिणगीने पेटला? ‘त्या’ एका कारणाची आग मस्तकात गेली?

| Updated on: Nov 17, 2022 | 9:16 AM

पैसे दोघांकडेही नव्हते, मुंबई सोडून दिल्लीत आले खरे! पण श्रद्धा नाराज होती...

श्रद्धा-आफताब यांचा वाद पैशांच्या ठिणगीने पेटला? त्या एका कारणाची आग मस्तकात गेली?
आफताब;ची आजच नार्को टेस्ट?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

श्रद्धा वालकर (Shraddha Walkar News) या वसईतील (Vasai) तरुणीची आफताब पुनावाला (Aftab Poonawala) याने हत्या केली असल्याचा गंभीर आरोप गेले काही दिवस केला जातोय. या हत्येमागे नेमकं कारण काय होतं, याचाही तपास सुरुय. 18 मे रोजी हे हत्याकांड घडलं असल्याचं सांगितलं जातंय. आफताबची लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकर हीचा गळा घोटून हत्या करण्याआधी त्या दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. लग्नासाठी तगादा लावणारी श्रद्धा आफताबला खटकू लागली होती. पण हत्येचं कारण फक्त इतकंच नव्हतं. शेवटच्या क्षणी झालेल्या भांडणाचा मुद्दा हा पैसे ठरला होता, असं तपासातून समोर आलंय.

मुंबईत घरात असलेलं सामान श्रद्धा आणि आफताबला दिल्लीत आणावं लागणार होतं. त्यासाठी दिल्ली मुंबई प्रवास करण्याइतकेही पैसे दोघांकडे शिल्लक उरले नव्हते. त्यामुळे आर्थिक अडचणींवरुन दोघांमध्ये भांडणं होऊ लागली होती.

श्रद्धाला मुंबईच्या घरातील सामान दिल्लीला आणायचं होतं. त्यासाठी ती आफताबवर दबावही टाकत होती. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 22 मे नंतर 54 हजार रुपये श्रद्धा वालकर हीच्या खात्यातून आफताब पुनावाल याच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले होते. तपास अधिकाऱ्यांकडून आता सोशल मीडियात झालेल्या चॅटचाही अभ्यास केला जातोय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला यांच्या पैशांवरुन अनेकदा वाद व्हायचे. श्रद्धाला आफताबवर संशयही येऊ लागला होता. त्यामुळे ती अस्वस्थ होती, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केलाय.

आफताबने गळा दाबून श्रद्धाचा जीव घेतला. त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केल्याचं पोलिसांनी म्हटलंय. दक्षिण दिल्लीच्या महरौली भागात हे हत्याकांड घडलं होतं. तीन आठवडे त्यानं तुकडे केलेलं श्रद्धाचं शरीर फ्रिजमध्ये ठेवलं होतं. त्यानंतर दररोज शरीराचे काही तुकडे तो वेगवेगळ्या भागात नेऊन टाकत होता आणि त्यांची विल्हेवाट लावत होता.

दिल्ली पोलीस आत आरोपी आफताब पुनावाला याला साकेत येथील कोर्टात हजर करणार आहे. पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी कोर्टात केली जाणार आहे. तसच त्याची नार्को टेस्ट करण्याची विनंतीही पोलिसांकडून कोर्टात केली जाण्याची शक्यता आहे. धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंतच्या तपासात आफताब पुनावाला याला कोणत्याही प्रकारचा पच्छाताप झाल्याचं दिसून आलेला नसल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

6 महिने आधी घडलेल्या या हत्याकांड प्रकरणी नुकतीच आफताब याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर या हत्याप्रकरणाचा तपास सप्टेंबर महिन्यात सुरु झाला. सुरुवातील मुंबई पोलिसांकडे असलेलं हे प्रकरण नंतर दिल्ली पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं. अनेक आठवडे श्रद्धा बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आल्यानंतर या हत्याकांड प्रकरणी एक एक खळबळजनक खुलासे आता समोर येऊ लागलेत.