Mumbai Crime : घोर कलियुग ! जेवण चांगलं नाही म्हणून भांडला, पोटचा मुलगा आईच्याच जीवावर उठला

| Updated on: Nov 28, 2023 | 12:18 PM

ज्या आईने नऊ महिने पोटात वाढवलं, जन्म दिला, कष्ट करू वाढवलं, त्याच आईशी क्षुल्लक कारणावरून भांडण करत तिचा मुलगा तिच्या जीवावरच उठल्याची अतिशय हादरवणारी घटना घडली आहे. ठाण्यात हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. पोटच्या मुलाने आईचाच जीव घेतला.

Mumbai Crime : घोर कलियुग ! जेवण चांगलं नाही म्हणून भांडला, पोटचा मुलगा आईच्याच जीवावर उठला
Follow us on

ठाणे | 28 नोव्हेंबर 2023 : ज्या आईने नऊ महिने पोटात वाढवलं, जन्म दिला, कष्ट करू वाढवलं, त्याच आईशी क्षुल्लक कारणावरून भांडण करत तिचा मुलगा तिच्या जीवावरच उठल्याची अतिशय हादरवणारी घटना घडली आहे. ठाण्यातून हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले असून पोटच्या मुलाने आईचाच जीव घेतला. आणि त्या भांडणाचं कारण काय, तर आईने चविष्ट जेवण दिलं नाही म्हणून. आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मुरबाड तालुक्यातील वेळू गावात घडल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. यामुळे संपूर्ण गावात खळबळ माजली आहे.

रविवारी संध्याकाळी मुलाने आईशी भांडण केले आणि रागाच्या भरात तिचा जीवच घेतला. या दुर्दैवी घटनेत ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. हादरवणारी गोष्ट म्हणजे आईवर हल्ला करून तिला संपवल्यानंतर आरोपी मुलाने झोपेच्या गोळ्यांचे अत्याधिक प्रमाणात सेवन केल्याचेही समोर आले. नातेवाईकांनी कसेबसे त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

घरगुती कारणांवरून आई-मुलात अनेकवेळा व्हायचं भांडण

पोलिसांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला आणि तिच्या मुलामध्ये अनेकदा घरगुती कारणावरून भांडण होत होते.रविवारी सुद्धा त्यांच्यात असाच वाद झाला. चांगलं, चविष्ट जेवण बनवलं नाही या कारणावरून आरोपीने त्याच्या आईशी रविवारी संध्याकाळी भांडण सुरू केलं. त्यामुळे तो प्रचंड चिडला होत. बघता बघता त्यांचा वाद टोकाला केला. आणि संतापाच्या भरात आरोपीने त्याच्या आईवर विळ्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा तत्काळ मृत्यू झाला.

हल्ल्यानंतर खाल्ल्या झोपेच्या गोळ्या

घरातील आरड्याओरड्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी तिथे धाव घेतली. तर महिला रक्ताच्या थारोळ्यात मृत्यूमुखी पडली होती. आईवरील हल्ल्यानंतर आरोपी मुलाने भरमसाठ झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. शेजारी आणि नातेवाईकांनी कसेबसे त्याला रुग्णालयात उपचारांसाठी नेले. आणि हल्ल्याबाबत पोलिसांना सूचना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करत मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवलाय

गुन्हा दाखल, मात्र अद्याप अटक नाही

आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. पण सोमवारी त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात येत आहे.