समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, अपघातात दोन ठार तर दोन जखमी

| Updated on: Feb 17, 2023 | 8:03 PM

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे समृद्धी महामार्गावरुन जात असताना कारचा डाव्या बाजूचा टायर फुटून ती कार दुभाजकावर आदळली. भरधाव कारचे टायर फुटल्याने कार दुभाजकावर जाऊन आदळली.

समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, अपघातात दोन ठार तर दोन जखमी
समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Image Credit source: TV9
Follow us on

अहमदनगर / मनोज गाडेकर (प्रतिनिधी) : भरधाव कारचा टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी समृद्धी महामार्गावर घडली. कारचा टायर फुटून कार दुभाजकावर आदळली. कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात ही घटना घडली. मयतांमध्ये एक पुरुष आणि एक महिलेचा समावेश आहे. दोन जखमी तरुणींवर जखमींवर कोपरगावच्या एसजेएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एअरबॅग उघडूनही दोघांनी जीव गमावला. वैद्यकीय कारणासाठी नागपूरहून नाशिककडे जात असताना हा अपघात झाल. राजेश रहाटे आणि अलका वझुलकर अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत.

कारमधील सर्वजण नागपूरहून नशिकला चालले होते

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील राजेश राजाराम रहाटे हे आपली मुलगी लीना राजेश रहाटे, भाची अवंतिका वझुलकर आणि मेव्हणी अलका वझुलकर यांच्यासोबत शुक्रवारी दुपारी नाशिकच्या दिशेने जात होते. चौघे जण आपल्या मारुती सुझुकी कंपनीच्या ब्रेजा कारने नाशिकला वैद्यकीय कारणासाठी चालले होते.

कारचा टायर फुटल्याने अपघात

यावेळी कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे समृद्धी महामार्गावरुन जात असताना कारचा डाव्या बाजूचा टायर फुटून ती कार दुभाजकावर आदळली. भरधाव कारचे टायर फुटल्याने कार दुभाजकावर जाऊन आदळली. अपघात एवढा भीषण होता की, यात कारचा चक्काचूर झाला. समोरील दोन्ही एअर बॅग उघडले असले तरी या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला,‌ तर दोन तरूणी जखमी झाल्या.

हे सुद्धा वाचा

दोघांचा जागीच मृत्यू तर दोन तरुणी जखमी

राजेश रहाटे आणि अलका वझुलकर यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. तर लीना रहाटे आणि अवंतिका वझुलकर या दोघी जखमी झाल्या आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस समृद्धी महामार्गावरील रुग्णवाहिका आणि एमएसएफचे जवान मदतीसाठी पोहोचले. या घटनेबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे दोन महिन्यांपूर्वी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर सर्वसामान्यांसाठी हा महामार्ग खुला करण्यात आला आहे. समृद्धी महामार्ग खुला झाल्यापासून अनेक अपघात या महामार्गावर घडले आहेत. दोन दिवसांपूर्वी कोपरगावच्या शिर्डी इंटरचेंजजवळ एक भरधाव कार संरक्षण कठड्यावर चढली होती. या अपघातात वाहनात असलेला चालक थोडक्यात बचावला.