लोकसभेच्या विजयानंतर शरद पवार इरेला पेटले, म्हणाले, काही झालं तरी यावेळी…

| Updated on: Jun 12, 2024 | 9:22 PM

देशात सरकार आले आहे, यावेळी आलेले सरकार दुसऱ्याची मदत घेऊन आले आहे. हे सरकार फार दिवस राहील असं वाटत नाही. कालच्या निवडणुकीत जी मदत केली. तिच मदत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही करा असेही आवाहन शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना केले.

लोकसभेच्या विजयानंतर शरद पवार इरेला पेटले, म्हणाले, काही झालं तरी यावेळी...
Sharad pawar
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

महाविकास आघाडीला लोकसभा निवडणूकात महाराष्ट्रात मोठे यश आले आहे. तर महायुतीला जबरदस्त फटका बसला आहे. यंदा बारामती सर करायची असे विडा भाजपाने उचलला होता. परंतू पवार फॅमिलीतच गृहयुद्ध लावून भाजपाने मजा पाहायचा प्लान रचला होता, परंतू अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला तर सुप्रिया सुळे यांच्यावर बारामतीकरांनी विश्वास दाखविला. याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी शरद पवार पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावात आणि इंदापूर तालुक्यातील बोराटवाडीत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. येथे त्यांनी लोकसभेच्या यशाचा हाच टेम्पो कायम ठेवत येणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडीला निवडून आणा असे आवाहन शरद पवार यांनी शेतकऱ्यांना केले.

पुरंदर तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की  सुप्रिया सुळे याच तुमचे आभार मानण्यासाठी येणार होत्या. परंतू मुलाचा परदेशात पदवीदान समारंभ असल्याने त्यांना मी तेथे जायला सांगितल्याने त्या येऊ शकल्या नसल्याबद्दल सुरुवातीलाच पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. राज्यातील अनेक छोटे मोठे प्रकल्प बंद आहेत. पुरंदर उपसाच्या प्रकल्पावर काम केले, मात्र त्यात काही दुरुस्ती केली पाहिजे, राज्य सरकारने त्यात गुंतवणूक करायला पाहिजे. गुंजवणी प्रकल्पाचे उदघाटन माझ्या हस्ते झाले होते अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली. सर्वांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांना या संदर्भात एक संयुक्त बैठक घ्यायला सांगतो. मुंबई किंवा पुण्यात यासंदर्भात ही बैठक घ्यायला लावतो. त्यात गुंजवणीचा सोक्ष मोक्ष लावून टाकू. गुंजवणीची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्यावर टाकूया असेही शरद पवार यांनी सांगितले.

बाहेरच्या लोकांनी जमीनी घेतल्यात

काही नेत्यांनी याभागात बरीच गुंतवणूक केली आहे असं ऐकलं आहे. अशोक टेकवडे यांनी 500 एकर जमीन घेतली आहे. विजय शिवतारे आणि डीएसके यांनी 500 एकर जमीन घेतली आहे अशी माहीती स्थानकांनी दिली. यावर शरद पवार यांनी बाहेरचे लोक जर जमिनी घेत असतील तर पाणी नेमके कुणासाठी द्यायचे मग याचा विचार करावा लागेल. पुणे जिल्हा एकेकाळी शिक्षणाचे माहेरघर होते. पुण्याला कारखाना द्यायचा नाही. कारखाना द्यायचा असेल तर बाहेर द्यायचा असा निर्णय मी त्यावेळी घेतला असेही शरद पवार यांनी सांगितले. शेती एके शेती करून चालणार नाही. एमआयडीसीला पर्याय नाही. याबाबत राज्य सरकारशी आणि उद्योग खात्याशी चर्चा करणार आणि जिथे शक्य आहे तिथे एमआयडीसी आणणार असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

काहीही झालं तरी सरकार हातात घेणारच

इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी गावातही शरद पवार यांचा शेतकऱ्यांशी संवाद झाला. यावेळी आप्पासाहेब जगदाळे उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून दुष्काळी परिस्थिती आपण पाहत आहोत. प्रत्यक्ष काय स्थिती आहे पाहावं. म्हणून आपण आलोय असे शरद पवार यांनी सुरुवातीला सांगितले. पाऊस सुरू झालाय, किती दिवस टिकेल ? दुष्काळ घालवेल का? हा प्रश्न आहे. नीरा डावा कालवा आपल्या भागात आहे. त्याची परिस्थिती खराब झाली आहे, ठरलेलं पाणी येत नाही. तुमच्यापर्यंत पाणी पोहचत नाही. आम्ही ही बाब राज्य सरकारच्या लक्षात आणून देऊ असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. निवडणुका तीन महिन्यावर आल्या आहेत, त्यामुळे सरकार किती लक्ष देणार हे सांगता येणार नाही. पण आम्ही निर्णय घेतला काहीही झालं तर सरकार आपल्या हातात घेण्याचं ठरवलेलं आहे, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्याला अशी अपेक्षा आहे असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.